माता सिद्धीदात्री
स्त्रीत्व किंवा आजकाल वापरल्या जाणारी टर्म म्हणजे feminism. ही सहज दर्शवणारी आपली संस्कृती. हे स्त्रीत्वाचे दर्शन म्हणजेच स्त्रीत्वाचा जागर म्हणजेच नवरात्र.
या कालावधीत आपण सर्वजण माता दुर्गाच्या विविध रूपांचा सोहळा साजरा करत नसून माता दुर्गेच्या विविध गुणांचा सोहळा साजरा करत आहोत .
आपली संस्कृती जर आपणास समजून घ्यायची असेल तर त्याच्यामागे असणारी कारणमीमांसा समजून घेणे क्रमप्राप्त आहे.
स्त्रीत्व आजच्या काळातही आजच्या अनेक स्त्रियांमधून आपणास दर्शनास येते परंतु त्याची सातत्यता नाही किंवा अशा सातत्यपूर्ण गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत.
स्त्रीत्व ही दाखवण्याची गोष्ट नसून , जिच्यात आपण आहोत ते सृष्टीरुपी स्त्रीत्व च आहे.
जी विशालता आणि व्यापकता आपल्या संस्कृतीमध्ये आहे. तिला आपण खूप संकीर्णता प्रदान केली आहे ,असे मला वाटते कधी कधी.
त्यामुळे आपणच आपल्याला लहान वाटतो पण मोठे समजायला लागतो.
खरं म्हणजे नवरात्र हा सोहळा स्वतःची वास्तविकता समजून घेण्याचा सोहळा आहे.
शरीर रूपाने आपणच स्वतःला मर्यादेत बसविले .परंतु मी ,माझी शक्ती ही अमर्याद आहे. हे कुठेतरी उमजते परंतु ते दृष्टीपथात येत नाही याचीच पिडा आहे.
कारण मला कळतं की मी असीम आहे .परंतु मग मी स्वतःला सीमांमध्ये बद्ध केले आहे. मला कळतं मी अमर्याद आहे .पण मला मर्यादा पडतात. मला कळतं मी अक्षय बलसंपन्न आहे. आणि मीच माझ्या बलाचा क्षय होताना बघते.
हे सर्व मला असे का दिसते कारण की मी दृष्टीगोचर आहे. ज्ञानगोचर नाही.
कारण माझा शत्रू म्हणजे अंधकार हा बाहेर होता, तो आता अज्ञानाच्या रूपाने माझ्या आत मध्ये येऊन बसलेला आहे.
मला येत असलेली विविध कौशल्य , मला असलेली माहिती मला माझे ज्ञान आहे .असे मला वाटते.
परंतु जेव्हा मी जगण्याच्या कसोटीवर हे उतरवायला लागतो तेव्हा ते टिकत नाही .याची पीडा मग माझ्या भाषेतून मला व्यक्त व्हायला लावते .
या पिडेतून मुक्त होण्याचा हा सोहळा आपण गेले आठ दिवस साजरा करीत आहोत आज शेवटची माळ.
माता दुर्गेचे नववे रूपं म्हणजे माता सिद्धीदात्री. नवरात्रीच्या या नवव्या दिवशी माता सिद्धीदात्रीचे पूजन केल्या जाते .ज्यांनी राक्षसांच्या अत्याचारापासून मुक्ती देण्यासाठी अवतार घेतला .
असे मानले जाते की मातेची मनोभावे पूजा केली असता ,सर्व कार्य सिद्धीस जाऊन सर्व मनोकामना पूर्ण होतात .
भगवान शंकरांनी सुद्धा माता सिद्धीदात्रीची तपस्या करून, आठ सिद्धी प्राप्त केल्या होत्या हे माता दुर्गेचं अत्यंत शक्तिशाली रूप मानल्या जाते .
देवी सिद्धीदात्रीच्या कृपेने भगवान शंकरांचे अर्धे शरीर नारीचे झाले होते .
ज्याला आपण अर्ध नारी नटेश्वर अवतार म्हणून ओळखतो.
शास्त्र वचनानुसार मातेचे हे रूप सर्व देवी देवतांच्या तेजातून प्रकट झालेलं रूप आहे.
राक्षसांच्या अत्याचारापासून पीडित झालेले सर्व देवी देवता विष्णू आणि महेश यांच्याकडे मदतीची याचना करीत आले.
तेव्हा भगवान शंकर आणि विष्णू तसेच इतर देवी देवतांच्या तेजातून माता सिद्धीदात्रीची निर्मिती केली.
पौराणिक कथेनुसार माता सिद्धी दात्री कडे अणिमा, महिमा, गरिमा ,लघिमा ,प्राप्ती, प्राकाम्य, इशक व विषत्व या सिद्धी आहेत.
देवी माता आपल्या सगळ्या भक्तांना या आठही सिद्धींनी समृद्ध करते.
आजच्याच दिवशी कन्या पूजन ही केले जाते. कारण संभावनेच्या रूपाने प्रत्येक कन्येमध्ये या प्रत्येक देवीचे रूप बघितले जाते.
देवीच्या या रूपाची तुलना स्त्री जीवनातल्या अशा पडावाशी केली जाते, की जिथे ही स्त्री सर्व अनुभवांनी समृद्ध आहे आणि तिला ज्ञानप्राप्ती झाली आहे.
हे ज्ञान प्रदान करणे आणि येणाऱ्या पिढींचा धर्ममार्ग प्रशस्त करणे हेच मातेचे कार्य आहे .
स्त्रीच्या या रूपाने ब्रम्हांडाचे पूर्ण स्वरूप जाणून घेतले आहे.व ब्रम्हांडावर विजय मिळवला आहे. आता कुठले ही काम करण्यास ती समर्थ आहे .
अशा प्रकारचं लौकिक रूप ज्या स्त्रीला प्राप्त झाले आहे अशा स्त्रीचे प्रतिनिधित्व करणारी म्हणजे माता सिद्धिदात्री.
एखाद्या घरातीलं आजी जशी आपल्या नात आणि नातवांसाठी अनंत कृपा प्रदान करणारं – अंतिम, पूर्ण ,असीम आणि दयावान असं स्त्रीचे रूप म्हणजे माता सिद्धीदात्री.
देवीच्या सिद्धीदात्री रूपाला लक्ष्मीचे रूप सुद्धा मानले जाते .जी शांती प्रदान करते करते. जिची पूजा देवी, देवता ,मानवचं नाही तर राक्षस सुद्धा करतात .
माता शैलपुत्री ते माता सिद्धीदात्रीचा हा प्रवास अतिशय अद्भुत प्रवास आहे.
“उपासनेपासून तर उपास्य” होण्यापर्यंतचा हा प्रवास आहे.
आपण जर का लक्षात घेतले तर भगवान शंकर पती म्हणून मिळावेत , त्यांची जन्मोजन्मीची साथ मिळावी म्हणून कठोर तपसाधना करणारी .
ते भगवान शंकरांनी उपासना करून माता सिद्धीदात्री कडून सिद्धी पदरात पाडून घ्याव्यात इथपर्यंतचा प्रवास.
उपासनेपासून उपास्य होण्याचा प्रवास.
प्रत्येक व्यक्तीचं जीवनही तसेच आहे. आपण सुरुवातचं तिथपासून केली होती. मातेचे प्रत्येक रूप म्हणजे व्यक्तीच्या आयुष्यातली प्रत्येक पडावं.
या विविध रूपातून आपण कोणते गुण घेऊ शकतो आणि आपल्या वास्तविक रूपापर्यंत येऊ शकतो हा अगम्य प्रवासाचे वर्तुळ हे नवरात्र पूर्ण करते.
माता शैलपुत्री चे गुण म्हणजे विश्वास, दृढता आणि वचनबद्धता.
माता ब्रह्मचारिणी शिकवते ती म्हणजे म्हणजे नियमबद्धता, सराव ,सुंदर व्यवहार आणि चारित्र्य निर्मिती.
माता चंद्रघंटा म्हणजे मनावर विजय मिळविणे , जागरूकता आणि तत्परते चे प्रतीक.
माता कुष्मांडा म्हणजे विकास सकारात्मकता आणि संभावना .
स्कंदमाता म्हणजे साहस ,करुणा आणि स्वतःवरील प्रेम अर्थात स्वतःचा स्वीकार.
माता कात्यायनी अर्थात समान वाटप पोषण आणि नातेसंबंध.
माता कालरात्री काळ, काम वेगाच गणित , आराम ,शांतता , प्रतिबिंबित्व आणि आत्मनिरीक्षण.
भगवती महागौरी पवित्रता ,ज्ञान.
आणि माता सिद्धी रात्री पूर्णतः, सिद्धता, यश आणि कधीही न संपणारा स्वतःमधील सातत्यपूर्ण सुधार.
अर्थात पूजन गुणांचे होते ते रूपांचे वाटले.
रूप महत्त्वाचे आहेच परंतु हे रूप जेव्हा आतून उमलते तेव्हा बाहेरच्या कुठल्याही वादळाने त्याची वाताहत होत नाही . ते उन्मळून पडत नाही .
हाच तर दाखवणे आणि असणे यातला फरक आहे .
यातील असणे इतके सोपे आणि सहज आहे .
तोच स्वतःचा स्वतःशी असलेला प्रामाणिकपणा तोच विकास आणि तीच “उपासना ते उपास्य” होण्याची यात्रा .
“हीच मौलिकता आणि हेच गुणात्मक परिवर्तन.”
हाच दया, कृपा ,करूणेचा अविष्कार.
दया कृपा करूणेचा परम्मोच्च बिंदू .
“हाच परमोच्च बिंदू म्हणजे प्रेम.”
प्रेम म्हणजेच दया ,कृपा ,करूणे ची संयुक्त अभिव्यक्ती.
“प्रेम म्हणजे शृंगार नसून, प्रेम हा अनन्यतेचा (ना कोई अन्य ) भाव आहे.”
या मार्गावर परस्पर सोबतीने चढण्याच्या पायऱ्या म्हणजे कृतज्ञता ,विश्वास , सन्मान, स्नेह ,ममता, वात्सल्य ,गौरव श्रद्धा आणि प्रेम.
कृतज्ञता मातेविषयी जिने प्रत्यक्ष जगण्यातून हा कृतार्थतेचा मार्ग आपणांस दाखवला. आणि ही कृतार्थता आपण परस्परांना कृतज्ञतेच्या मार्गाने पूर्ण करू शकतो जे अमूल्य आहे.
हाच परस्पर न्याय . हीच प्रत्येकाची मौलिकता आहे आणि हेच मूल्य
परंतु सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे
“प्रतिमा प्राप्ती नही हो सकती और उपमा उपलब्धी नही हो सकती ”
म्हणून हे कष्ट साध्य आहे.
म्हणतात ना “मानव को जितना उन्नता अवकाश प्राप्त है|
उतना ही अवनता अवकाश भी प्राप्त है ||”
समाप्त.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏ॐदेव्यै सिद्धिदात्र्यै नमः।। गुणमयै गुणाश्रयै नारायणी नमोस्तुते।।🙏
कृतज्ञता अन् कृतार्थतेसह🙏🙏
खऱ्या अर्थाने नवरात्री जागर आणि सीमोल्लंघनही!!!
असेच छानसे अंतर्मुखतेने व्यक्त होण्यासाठी शुभेच्छा !!!💐
💐👌